Tuesday, 27 June 2023

आमच्याकडे वारी येते.

 आमच्याकडे वारी येते. वारीत बायका येतात. पुरुष येतात. अबाल वृद्ध येतात. आनंद येतो, आपुलकी येते. दु:खही येतं.  धर्म येतात, रंग येतात, जातीनं हजर होऊन जाती येतात. बैल येतात, घोडे येतात. फुले येतात. व्यवसाय बहरतात. तुळसही येते. पोलीस येतात. वेगवेगळ्या यंत्रणा यात सामील झालेल्या असतात. पाणी येतं. यासारख्या असंख्य, अरंग गोष्टी अनंत रंग घेऊन येतात. 


ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला पालखी देहूतून निघाल्यापासून आमचं तिच्या हालचालीवर लक्ष असतं. या पालखीचं प्रस्थान झालं की झालं  उभ्या महाराष्ट्रातील पालख्या निघण्याच्याच तयारीत असतात. सेनापतीने आदेश द्यावा नि सार्‍या सैनिकांनी सज्ज व्हावे तसे.


 त्यानंतर *'पालखी आज कुठे आली?'* हा प्रश्न पंधरा दिवस रोज नव्याने घराघरात उगवतो. प्रश्नाचं उत्तर घेऊन पालखी रोज एकेक गावे पुढे सरकते. ती जसं पुढं सरकते तसे आमच्याकडचे लोक धावण्याच्या शर्यतीत जसा खेळाडू वेगवेगळ्या अंकाच्या काऊंटला वेगवेगळ्या पोजिशन मध्ये असतो तसे तयारीत असतात. नियोजित लोक नियोजित ठिकाणी येणार असल्याने गावंच्या गावं वेगवेगळ्या ठिकाणाहून येणार्‍या वारकर्‍यांच्या प्रतिक्षेत असतात. वारकर्‍यांच्या स्वागतास सज्ज असतात.


 दिंड्या पताकात सगळा रस्ता लाल होऊन नियोजनाप्रमाणे वाहत असतो.  भजन- ओव्या- टाळ - मृदंग यांच्या तालात वारी प्रवाहित होऊन आसपासचा परिसर जीवंत करत असते. कुण्या दिंडीत लाऊडस्पिकरचा वापर करुन, कुण्यात रेकॉर्डिंग वापरुन, कुठं तोडांने हरिनाम म्हणत टाळ व टाळीच्या गजरात दिंड्याच्या दिंड्या वाट मागे सारत असतात.


 मुख्य पालखीची पोहोच पाहून रस्त्यावरील वाहतुकीची दिशा वळवलेली असते. त्यामुळे रस्त्यावरुन वाहने नुसती चालत असतात. माणसावाहनांनी गजबजून रस्त्याला व गावांना सुगीचे दिवस आलेले असतात.


 गावागावातील शाळाशाळांमध्ये वारीचं प्रतिक बालवारकरी साजरे करत असतातच. जेव्हा वारी सायंकाळवेळी गावागावात शिरते तेव्हा सगळ्या गावागावांतून एकच धांदल उडालेली असते. तिचं स्वागत होऊन लगेच लोक किर्तन भजनाला तयार असतात. इतक्या लांब चालत आलो नि थकलो म्हणून अंथरुण न धरता त्या गावातील लोक, या गावात अगदी मनसोक्तपणे मनातील भक्तीभाव उधळत असतात. वारीत आलेले लोक व गावातील लोक मिळून मिसळून गावात विठ्ठल नामाचा जयघोष करतात. प्रत्येक मागील गावावरुन आलेले चैतन्य पुढच्या गावात पेरण्याचं काम हे वारकरी करत असतात. ते जिथंतिथं रुजावं व दरवर्षी त्याची वाढ व्हावी असंच प्रत्येकाला वाटत असावं. 


भारुड, खेळ यामुळे तर लहानांपासून म्हातार्‍यापर्यंत सगळ्यांच्या रक्तात उत्साह भरला जातो. आगळ्यावेगळ्या सुवासांच्या पंगती उठल्या की रात्रभर गावांतून भजन-किर्तन-टाळ-ओव्या यांचा नुसता पाऊसच पडत असतो. पाऊस पडला म्हणजे त्यातून विधायक घडत असतंच, तसंच हे. जमिनीतून पीक तरारुन यावं यासाठी जमिनीला जी मशागत हवी तसं मानवी मन निकोप वाहतं राहण्यासाठी हे आवश्यकच. 


लग्नघटिका जसजशी जवळ येऊ लागते अन् पाहुण्यांची, नातेवाईकांची गर्दी वाढत जाते तसं वाखरी, पंढरपूर जवळ आले की आसपासच्या गावागावात वारकर्‍यांची गर्दी वाढत असते. घराघरात, मंदीरामंदीरात , जागोजागी महाराष्ट्र एकमय झालेला असतो. ही फक्त गर्दी नसते; तिथे वारीचा भाव चराचरात भरलेला असतो. हा भाव या माणसांच्या गर्दीपेक्षाही प्रचंड प्रवाही व अस्तित्ववादी ठरतो. कारण हा वास्तव माणसांनी तयार झालेला असतो.


   नदीच्या प्रवाहावर धरण बांधून पाणी साठवलं जावं तसा विठ्ठल स्वत: धरण होऊन सर्व वारकर्‍यांना कवेत घेण्याच्या तयारीत असतो. त्याने कवेत घ्यावे म्हणून तर वारीचा हा प्रवाह अनेक खाचखळगे पार करत कोसो दूर आलेला असतो. 


अशी वारी आमच्याकडे येते. येताना खूप काही घेऊन येते...!



✍🏻फुटूवाली मी

      कृष्णा


Sunday, 14 May 2023

Mothers Day

 आयुष्यात समोर दिसणार्‍या अनेक बाळांच्या वेदनांनी माझं आईपण जागं झालं नि मी 'आई व्हायचं नाही' असं ठरवलं.   


प्रसूतीवेदनांनी आई न होताही समाजातील बाळांच्या वेदना कमी करुन आई होता येतं यावर माझा ठाम विश्वास होता नि आहे. 


स्वत: स्विकारलेलं 'असंच आईपण' जगणं नेमकं कसं असतं? की  ज्याला समाज कायम झिडकारतो. समाजाला समाजाच्या चौकटीतीलच लोक आवडत असतात. त्या चौकटीबाहेरच्या लोकांना समाज एनतेन नाकारत असतो. त्रास देत असतो. आई नसणारी बाई समाजातील 'पुरुषी मानसिकतेला' 'मोकळी बाई' वाटत असते. त्याचबरोबर 'मोकळ्या बाईचा' समाजातील 'आई असणार्‍या स्त्रिया' पुरुषांपेक्षा जास्त अवहेलना करतात.


प्रत्येक बाईची 'तुलना' ही 'या स्त्रीला मूल झालंय का?' या वरुन स्त्रियाच करतात. मूल होणं हीच स्त्रिच्या अस्तित्वाची कसोटी ज्या समाजात समजली जाते त्या समाजात 'पुरुषाकडून आई होणं नाकारणार्‍या' स्त्रिच्या 'अस्तित्वाला' किती झगडावं लागत असेल?


'आई होणं' या समाजाच्या समजेच्या धगीतून बाहेर पडणं म्हणजे काय असतं? आई असण्याच्या खोट्या पुरुषार्थाला बळी न पडतानाचं आयुष्य  कसं असतं? 


आपलं 'आईपण' हे आपण मान्य करण्यावर जन्म घेत असतं न की पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रुढीपरंपरावर.  हे आई होण्याच्या मानसिकतेत असणार्‍या बाईला कधी कळणार?


तसं तर कोणतीच आई होणं सोपं नसतं. दोन्ही प्रकारे आई होण्याच्या प्रसुतीकळा वेगळ्या ठरल्या तरी वेदनेला मात्रा मात्र प्रेमाचीच असते. 


नैसर्गिकरित्या आई होणं हा समाजाच्या प्रवाहाचा भाग असतो नि दुसर्‍या प्रकारे आई होणं म्हणजे समाजप्रवाहाविरुद्ध पोहणं असतं. पोहण्याने तात्पुरता जीव वाचतो पण ध्येय, इच्छा, जिद्द, निर्णयातील ठामपणा असेल तरच किनार्‍याला लागू शकतं. किनारा गाठणं म्हणजेच निर्णयावर ठाम राहणं. हे निर्णयावर ठाम राहणं इतकं का सोप्पं असतं? काय गमावलं जात नाही यात? यादी करुच त्याची तर खूप वाढत जाईल. पण याचा शेवट असतो समाधानात. ज्यासाठी माणूस आयुष्यभर पळत असतो. असं समाधान लाभणं म्हणजेच कल्पोकल्पित 'मुक्ती' असेल तर त्या मुक्तीलायक तुमचे निर्णय तुम्हाला बनवू शकतात अन्  मरणा आधी तुम्ही मुक्तीत जगू शकता. 


काळजातील मातृत्वापेक्षा बांधीलकीतील दातृत्वाची जाग सुद्धा मातृत्वाला मागं टाकू शकते.


समाजातील अनाथ बालकांची आजकालची भयाण परिस्थिती पाहता समाजानंच आई होण्याची गरजंय असं आपल्याला वाटत नाही का?


आईशिवाय जन्मत नसे कोणी.

कोणत्याही विशेष दिनांचं साजरीकरण हे कर्तव्यात साजरं होत असतं. आपण या कर्तव्यासाठी जागं आहोत का?  या जाणीवेनं आजचा दिन साजरा करुया.


Mothers Day!!


✍🏻फुटूवाली मी

      कृष्णा


Sunday, 23 April 2023

पुस्तक दिवस

 *फकिरा*


निराशेच्या कोंडात सापडलेली झुंजार माणसं गांगरत नाहीत. कारण झुंजणं हा त्यांचा स्वभाव बनलेला असतो. मन हे मूळचंच बेडर नसतं. ते अविरत होणाऱ्या आघातांनी निर्भय होतं. जसं पोलाद निखाऱ्यात कैक क्षण तापून बाहेर येतं नि कणखर होतं, तद्वतच त्या सर्वांची मनं जन्मभर दुःखाच्या भट्टीत जळून कणखर झाली होती. असं फकिरा व त्याच्या समाजातील  लोकांचं वर्णन अण्णा भाऊ साठे त्यांच्या 'फकिरा' या कादंबरीत करतात. 


समाजाच्या तळागाळातील साधे सुधे लोक सामाजिक वास्तवरुपी निखार्‍यातून असेच पोलादाप्रमाणे तयार होत असतात. ही प्रत्येक काळात आजपवेतो चालत आलेली व इथून पुढेही चालू राहणारी प्रक्रिया आहे. फकिरानंतर आजपर्यंत असे कितीतरी फकिरा होऊन गेले असतील. म्हणजे जोपर्यंत समाज नावाचा निखारा आहे तोपर्यंत साध्या सुध्यांना कैक क्षण तापावं लागणारच. फकिरा व त्याचा समाज शिकला नव्हता म्हणून त्याच्यावर ही वेळ आली हे त्या परिस्थितीनुसार बरोबर जरी असले तरी आजच्या पुस्तकपढीत समाजात असा काय वेगळा बदल जाणवतो तेव्हा? साचा बदलला तरी आतला माल तोच आहे. अन्यायच करायचा असेल तर त्यात शिकलेले, अडाणी, स्वकीय ,परकीय असे काही भेद असावेच असं आजची परिस्थिती पाहता वाटत नाही. शासन व समाज यांच्यातील लढा कधी संपेल? असा तेव्हा अनुत्तरीत असणारा प्रश्न आजपावेतोही उत्तरीत झालेला नाही. फकीराचा 'गबर्‍या' नावाचा घोडा आजही समाजवास्तवातून पळतच आहे. तो अजूनही वाट पाहत आसावा का की 'अजून एखादा  फकीरा त्याच्यावर मांड टाकेल? म्हणूनच पोलाद तयार होणं ही तेवढी सोपी गोष्ट नसते. त्यासाठी संदेवनशील मन व अन्यायविरुद्ध बंड करणे याची अट ओघाने आलीच. हेच फकीरातून अण्णा भाऊ साठे सांगतात.


फकिरा कादंबरी एक साचा आहे.  या साच्यात वेगवेगळा काळ व त्या काळातील सामाजिक परिस्थिती ओतली की तशाच आशयाची सामाजिक परिस्थिती हुबेहुब तयार होते. अन्याय, भांडवलशाही, गरीब- वंचित लोकांचं शोषण, संघटन तोडण्याचा प्रयत्न अन् फितुरीसारखी लागलेली कीड. फितुरी झाली नसती तर काही काळ का असेना फकिरा व त्याचा समाज अजून अभिमानाने व सुखाने जगला असता. तसंच काळ कोणताही असो एकत्रित संघटन ही गोष्ट किती आवश्यक आहे ही गोष्ट फकिरा वारंवार सांगून जाते. 


गरीबीमुळे पोटासाठी करावी लागणारी अन्नधान्याची चोरी ही खरी तर चोरी नसतेच. त्या त्या काळासाठी परिस्थितीने केलेली adjustment असते. परंतु या adjustment चा शासन गुन्हा किंवा घोर अपराध म्हणून गैरवापर करते. तेव्हा सर्वसामान्यांचं जीणं हे जीणं न राहता शासनाने त्यांची केलेली चक्क फसवणूक असते. 


फकिरा प्रवाही कादंबरी आहे. काळाकाळातून गबर्‍याप्रमाणं तिचं अखंड दौडत राहणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक काळातील समाजाला फकिराची आवश्यकता असतेच. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी फकिराच्या मांग समाजातील एकीही लागते. तरच असे अनेक फकिरा तयार होत राहतील व त्याला साथ देणारा समाजही तयार होईल. 


त्याहीपुढे फकिराच्या भौतिक परिस्थितीत बदल होणे गरजेचे आहे. कारण त्याकाळी सह्यकड्यांनी,  डोंगरझाडींनी फकिराला पोटात घेतले. पण आज सह्यकडा आपल्याला म्हणेल, 'फकिरा अडाणी होता. म्हणून मी त्याला सहाय्य केलं. त्याला पुस्तकांची साथ नव्हती म्हणून मी त्याचा आधार बनलो. पण आज तुम्ही पुस्तकपढीत युगात आहात. मी तुम्हाला साथ देणार नाही. कारण पुस्तके वाचून शहाणं होण्याइतपत तुमचा इतिहासही कणखर होता. भविष्यही असेल. तुम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला बळ देणारी ताकद नक्कीच पुस्तकांत आहे. वर्तमानात त्यांचा वापर करा.'


प्रत्येक समाजवास्तवात ताजं वाटणारं लेखन हेच अण्णा भाऊ साठेंच्या लेखनाचं वैशिष्ट्य. फकिरात काही ठिकाणी उगाच वर्णन केलं आहे. पण एखादाच दोष सोडता ही कादंबरी  प्रत्येक काळातील मनामनावर आरुढ होऊन ती पुढचा काळ गाठत आहे. असंघटीत समाजात प्रेरणा पेरुन पुढचा प्रवास न थकता करत राहील यात शंका नाही.



(पुस्तक दिवस)


✍🏻फुटूवाली मी

      कृष्णा



Friday, 14 April 2023

माझ्या 'बा' ची भाषा

 माझ्या 'बा' ची भाषा



गुरवार दुपारी आय आन् बा उंबरे ला गिलती. काल संद्याकाळी म्हाघारी आली. 

संद्याकाळी जेवताना बा मनला,

"आगं, आगं,आगं! काय नवालच झालंय!"


"काय झालं वो भाव?" मी.


"काय खरं न्हाय. सरकारला तर काय कळत न्हाय. ह्या इस्टीत गर्दी. त्या इस्टीत गर्दी. आन् गर्दी कुनाची तर बायांची. हिकडच्या बी इस्टीत बायकाच, तिकडच्या बी इस्टीत बायकाच. इक्त्या बायका की बूलूच नकू."


"आवं भाव, तुम्हाला कसं फुकट न्हिती इस्टी. कुंच्याबी गावाला. पंच्याहात्तरच्या वरचं ना तुमी! मनून तुमी कुटंबी पळता. तसंच आता बायकान्ला पनास टके सूट हाय मनून जात असत्याला आपापल्या कामाला न्हायतर पै पावन्याकडं."


"मी काय उगं हिकडं तिकडं जात न्हाय. काम आसंल तरच जातू. हुय ना गं?"


"तुमाला काय हुतंय वं? त्यांच्या त्या जात्यात्या. त्यांच्या त्या येत्यात्या. तुमाला काय तरास हाय गा? उगं हुय ना गं आन् न्हाय ना गं." आय.


"काय? खरं सांग बरं. मी कामाशिवाय जातू का ब्हायर इस्टीनं? पन लय लोकांनी इस्टीत गर्दी केल्यावर बसाय जागा बी भेटत न्हाय." आसं मनत यकटंच हासू लागलं.


"काय झालं वो भाव हासायला.?"

 

"आगं, ही बोलताना मला यक आटवलं. म्हातार्‍या मानसान्ला फुकाटंच इस्टी चालू झालती तवाची  गोस्टंय. तर... यक मानूस कोपरगावला चाल्ला हुता. तवा कन्डाक्टरनं त्यला इच्यारलं, 'बिना तिकिटाचं कुटं चाल्लाय आजूबा.? म्या चाल्लूय कोपरगावला. म्हागच्या आटवड्यात माजी तंबाकूची पिशवी इसरलीय लिकीकडं. तवा मनलं, कुटं इकत आनत बसता. इस्टी फुकाट हाय तर चला तंबाकूची पिशवी घिऊन येवाव. मनून चाल्लूय.' आन ही आयकून इस्टीतली सारी मानसं हासाय लागली. इवडूल्या तंबाकूपाय पंडपुरातनं इक्त्या लांब चाल्ला हुता ती मानूस.  तर आशा गमज्या आसतेत यकाकाच्या. पन आज इस्टीतल्या बायका बगून मला आजबच वाटाय लागलं. ती सांगतूय मी." आसं मनत बा नं आर्दी वाटी आंब्याचा रस ताटात वाडून घेतला. तसं म्या जाग्यावरच उडाली.


"भाव, लय रस खाव नगा .आंब्याच्या रसानं साकर वाडंल. आजारी पडचाल. आन् आजारी पडल्यावर तुमची फुकाट इस्टी कामाला येत न्हाय. माज्या आल्टूतनंच घिउन जावाव लागतंय. आल्टू तुमाला फुकाट हाय पन मला त्याल टाकाव लागतंय. आन् तुमाला डाक्टरबी फुकाट तपासत न्हाय. गोळ्या आवशीदं बी फुकाट न्हायती. "


"अंsss. म्या कुटं लय घेटलाय रस. उगं थोडाच घेटलाय. यवड्यानं काय न्हाय होत मला."


"आन् झालं तर... ?"


"न्हाय होत."


 "होगा भाव, मी यकदाच तुमाला सांगती. रस खावून जर तुमी आजारी पडला तर म्या तुमाला इस्टीनंच न्हेनार हाय. किती गा ताप हुईना. (बा च्या दवाखान्यात जाताना तीस किलूमीटरला तीन्दा इस्टी बदलावी लागती.) तुमी फुकाट आन् मी आरद्या तिकिटात. मंजी माजा खर्च वाचंल."


"पुरगी हाय गा कोन हायच मनाव. आपल्या बा ला आसं मंत्याती गाय?"


"मग काळजी घ्येत जावावो तुमी."


"हं.. मला लागली शिकवाय....काळजी घ्या मन.!"


😆😇😆😇😆





✍🏻फुटूवाली मी

     कृष्णा

Tuesday, 11 April 2023

माझ्या 'बा' ची भाषा

 काल 'बा' ची साकर लो झालती. जोराची चक्कर येतानाच आयनं सावरलं. पटपट च्या, साकर व जेवान दिऊन जरा सुद्दीवर आनलं. पण साकर समदी लो हुनं म्हंजी जित्यापनी मराणच आसतं. त्यज्यानंतर पन बेफाम आशक्तपणा यितू. कायच ग्वाड वाटत न्हाय. जीव नुस्ता बेजार हुतू. काळजाची धड धड हुती. भ्या वाटतं. एकटं वाटतं. संद्याकाळी म्या आल्यावर आयनं मला लो साकरंचं सांगितलं. त्यजामुळं आज बा ला दवाखान्यात आननं क्रमप्राप्त हुतंच. पण सकाळची साळा आसल्यानं व साळंतलं सर सुद्दा त्यंच्या आयला दवाखान्यात रातीच घिऊन गेल्यानं मला साळा गाटनं भागंच हुतं. माज्यापुडं बा ला कसं दवाखान्यात न्याव आसा परस्न पडला. घरी आय, मी व बा. यकट्या किवा त्या दोघास्नी पाटवनं  बराबर नव्हतंच. 


आमचं  जावयबापू नेमकं उपरीला मंजी जवळच्याच गावाला आलं हुतं. त्यनला बा ला दवाखान्यात आकलूजला न्ह्यायला सांगितलं. बा चा दवाखाना बी बा सारकाच आयटदार हाय. पाटं स्हा ला फोनवर नंबर लावाल लागतू. न्हाय लागला तर मग ७ ला जावून परत्यक्ष नंबर लावाव लागतू. आमचं घर ती दवाखाना ३०km आंतर. मग फोनवर नंबर न्हाय लागला तर सकाळी ७ ला जानं शक्य हूत न्हाय. मग आकलूज ला आज मुलानी सरला सांगून नंबर लावला. 


जावयबापूला सांगितलं, आल्टू दवाखान्यात घिऊन जावा. तुमची पल्सर  घरी ठिवा. साळा सुटल्यावर मी तुमच्या गाडीवर दवाखान्यात यिती मग तुमी तुमच्या घरी जावा. तसंच झालं. म्या सकाळीच साळंत स्कूटीवर गिली. ८ ला जावयबापू बा ला घिऊन  दवाखान्यात गेलं. दवाखान्यातच उपाशीपूटीची साकर व जेवल्यानंतरची साकर तपासावी लागती. त्यजामुळं जाताना बा ला जेवनाचा डबा द्याव लागतूच. ही सगळं कराय कशीबी दुपार हुतीच. तवर म्या जानार हुती. 


साळा सुटली. घरी आली. स्कूटी ठिवली. जावयबापूची गाडी घितली. आता आसली पलसर चालवायचं मंजी जरा भ्यावंच की. भ्याव ह्यासाटी की घेर ची दूचाकी गाडी लय हातात नसती. कदीतर चालवायचं मंजी जरा दबकतच चालवावी लागती. तसी आदी लय दिवसापूरवी स्प्लेंडर, युनिकार्न, पलसर आजून काय काय गाड्या चालवल्या हुत्या. पण त्या कदीतरीच की. यकदा बुलेट बी चालवली हुती. पन कुंच्याच गाडीचा सराव न्हाय. कदीतर गाडी चालवनं आन् सारकं चालवनं यात फरक आसतूच की. त्यजामुळं वरसा द्वान वरसातनं गाडी चालवायची मंजी कलच, आस्कीलीटर ह्यंचा संबळांग डंबळांग चालू आसनबारच की. त्यातनं नव्या पलसरची बयटक जरा जडच. आन् सार्‍यात म्हत्त्वाचं मंजी स्कूटीचा बिरेक आसतू ती घेरच्या गाडीचा कलच आसतू आन् सारा डाव हितंच फसतू. पन मला फसून जमतच न्हाय. जबाबदारी म्हत्त्वाची. सारं नीट आटवलं. मंजी यका  पायातला बिरेक, डावक्या हातातला कलच, जेवत्या हाताचा आक्सीलिटर, दुसर्‍या पायातला घेर. मिंदूत सगळं फिट केलं. आन् बा ची माझ्या शिरंवर आसनारी जबाबदारी घिऊन, माजं शिर्‍यार पलसर ठिऊन म्या पनास साट च्या येगानं निगाली. तवर बा च्या दवाखान्यातल्या तपासन्या झालत्या. डाक्टरकडनं रिपुर्ट घेतला. गोळ्या आवशीदं घितली. पलसर जावयबापूला दिली. आल्टूतनं बा ला घिऊन घरी आली. 


सांगायचं कारान मंजी स्कूटी आसू, घेर ची गाडी आसू की चार चाकी आसू. ही शिकायला पायजे. कारण येळ मानसाला सांगून येत न्हाय. कुंचबी काम करायचं मनलं की आपलं लय काय आडू नाय. आपल्या पार्तमिक गरजा भागवन्यापुरतं तरी आपन शिकाय पायजी आसं बा व दादा मंतू. यकाद्याची आडनड भागवनं म्हंजीच आपलं काम यसस्वी हुतं आसं बा  व दादचं मननं आसतं. 


मला घेरची दुकाची भलंही जोरात येत न्हाय पन हाळूहाळू चालवाय यिती. म्या रेसमदी न्हाय गाडी चालवू शकत पण आडनड भागवायपुरतं मातूर मला जमतंच जमतं. उगं शायनिंग मारायची मनून गाडी हानत नसतू आमी तर गरज मनून आमच्या हातात गाडी आसती. हे मातूर ध्येनात घ्यायची गोस्ट हाय बरं का!!!

 

(गाडी हाय तवर फुटू काडून घेतला. आता यात काय माजी चूक न्हाय बगा!😇😇.)


Friday, 7 April 2023

जीवाची मुंबय

 'जीवाची मुंबय'


मागील वेळी डिसेंबर महिन्यात मुंबईला (पवई) आल्यावर जीवाची मुंबई काय नि कशी केली सांगायचं बाकी ठेवलं होतं. तसं तर आज पण त्याच ठिकाणी पवईला आलेय. आपण जाईल ते ठिकाण पर्यटन स्थळ असतं. त्यामुळे लहान बहिणीला परीक्षेला परीक्षा सेंटरवर सोडून  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान गाठलंय. 


उंच उंच व मोठी झाडी असल्याने परीक्षा सेंटरवर जातानाच वाटेत असणार्‍या या हिरव्या वनराईने माझं लक्ष मागच्या वेळीच वेधून घेतलं होतं. तिची परीक्षा होईपर्यंत मी कुठं बसावं हा तेव्हाचा व आताचा ही प्रश्न या उद्यानाने सोडवला होता. फरक हा आहे की मागच्या वेळेच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या परिस्थितीत खूप फरक आहे. तुलनात्मक दृष्ट्या त्यावेळी माझ्याकडे बहिणीची व माझी  अशा दोन सॅक होत्या. आता फक्त पर्स आहे. तेव्हा मला या उद्यानाबद्दल काहीही माहित नव्हतं. आता मात्र मी बिनधास्त येऊन या बाकड्यावर बसून लिहित आहे. तर तेव्हा काय झालं याकडे वळूया. 


   भरपूर ओझे असणार्‍या दोन सॅक घेऊन, अनेक उत्सुकतेंचा जुडगा मनाच्या कंबरपट्ट्यात अडकवून मी उद्यानात प्रवेश केला. हे एक रिक्षावाला पाहत होता. अर्थात तो माझ्यामागेही आला. सकाळ आठची वेळ असल्यानं morning walk ला वेगवेगळ्या वयातील लोक उद्यानातून इकडे तिकडे फिरत होते. सॅकचं ओझं माझ्या दोन्ही खांद्याला अडकवल्यानं माझ्या चेहर्‍यावर तसा थोडा त्रासिक भाव होता. ते ओझं कुठं खाली करता येईल यासाठी मी जागा शोधत होते. उद्यानाच्या गेटच्या आतील बाजूस समोरच कारंजा लावलेली मोठी जागा असते तसा राऊंड होता. मला ती जागा बरी वाटली. सॅक तिथे ठेवून दिल्या व बागेत बॅगकडे लक्ष ठेवत कुठे फिरता येईल असा विचार करत होते. मगाचा रिक्षावालाही माझ्या आजूबाजूला फिरत होता. आज जे माझ्या लक्षात येतं ते त्यावेळी येण्याचं कारण नव्हतं. त्याला अनेक कारणे आहेत ती खालीलप्रमाणे.


पहिलं कारण हे की मुंबईसारख्या ठिकाणी सिमेंटच्या जंगलात मोठमोठ्या झाडांचं लह‍ानसं जंगलच पाहायला मिळावं याचा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. रिकाम्या दोन तासांचा कालावधी या जंगलात घालवायला मिळावा याचा मला परमोच्च आनंद झाला होता. वेगवेगळ्या पक्ष्यांचे, किंड्याचे आवाज मला जास्तच खुणावत होते. मैनेचा चिवचिवाट, खंड्याचा चिर्र र्र र्र र्र र्र, तांबटाचा हूक हूक आवाज त्या सॅक कुठेतरी टाकून मी त्यांचा शोध घ्यावा असं सुचवत होते. विशेष म्हणजे माझ्या डोळ्यासमोरच विविध रंगांची फुलपाखरं इकडे तिकडे पळत होती. मला त्यांचे फोटो काढावयाचे होते. बागेतील अजून कशाकशाचे मला शोध लावून तेही मला फोटोत कैद करायचे होते. बागेत ठिकठिकाणी माझ्याही पोज स्थिर राहणार होत्याच. मला आनेक गोष्टी करायच्या होत्या. त्यामुळे मला घाई होती. गडबड होती.  पण दोन्ही सॅकनी मला जरा अवघडूनच ठेवलं होतं. त्या अनुभवावरुन ठरवलं की पून्हा फिरायला जाताना अंगावरचा एकच ड्रेस घ्यायचा. बाकीचा फापटपसारा उगं वागवायचा नाही. भले एक ड्रेस चार दिवस घालावा लागला तर बेहत्तर!! ते पुढचं सगळं खरं होतं पण सध्या सॅकची सोय लावणं महत्त्वाचं होतं. तुम्हाला सांगते हे जंगलच मला जीवाची मुंबई केल्याचा आनंद देणार होतं. कारण मला जे जे पाहिजे होतं त्यातील बर्‍याच गोष्टी इथं अनायसे उद्यानात होत्या.  तिसरी गोष्ट म्हणजे माझ्या मनात चोरांचं चांदणं नव्हतं. मस्तपैकी सकाळच्या वेळचा सुर्याचा लख्ख प्रकाश मनात अन् बागेतही होता. 


बागेत ठेवलेल्या सॅकपासून मी ७०-८० मी. वर फिरत होते. तो मगाचा रिक्षावाला सॅककडे गेला. तिच्या आजूबाजूला काहीतरी करु लागला. पण खाकी ड्रेस अंगावर असणारा हा इसम रिक्षावाला नसून बागेतील कामगार असावा असं म्हणत  रिक्षावाला ते शिपाई अशी त्याची मी बढती केली. माझं तसंही लक्ष होतं पण मनात चांदणं नव्हतं. कशाला कोण लोकांच्या खाजगी वस्तूला हात लावेल नाही का? मनात प्रश्न घेऊन मी सॅककडे पळत आले. तसा तो बढती मिळालेला कामगार सॅकपासून लांब गेला. तरीही माझ्या मनात चोरी कसली ती आलीच नाही. 


 बागेच्या एकाच बाजूला किती फिरणार म्हणून सॅक उचलून वाकलेल्या दोन्ही खांद्यांनी शंभरेक मीटर चालत बागेची दुसरी बाजू निवडली. एका बाकावर सॅक ठेऊन झाडावरील पाखरांचे आवाज ऐकत कोण कुठं बसला असेल असे अंदाज काढत फुलपाखरांच्या मागे मी धावू लागले. लोकांप्रमाणेच माझं ते मॉर्निंग वॉक असावं असं काहीजणांना वाटलं देखील असावं. पण सॅक च्या काळजीने मला लांब जाता येत नव्हतं.   भुंगा कसा फुलाच्या आसपासच घूं घूं करत उडत असतो तसं सॅकच्या आजूबाजूला माझ्या नजरेचं घूं घूं चालू होतं. अशातच एका झुडूपाच्या पानाच्या मागील बाजूस मला एक फुलपाखरू दिसलं नि मी त्याचे फोटो घेण्यात गुंग झाले. ते करता करता माझं सॅककडं लक्ष गेलं तर मगाचा तो कामगार माझ्या सॅकला हात लावताना दिसला. मी ओरडताच तो थोडा बाजूला जाऊन थांबला. 


आता मात्र खरा प्रकार माझ्या लक्षात आला. खाकी वेशातील त्याचा बाणा मला ओळखायला आल्यानं मी चांगलं   झापायला सुरुवात केली. चांगल्या हासडून शिव्या दिल्या. 'माणूसकी' बद्दल पा-सात वाक्ये सुनावली. आपल्या  मराठी भाषेच्या श्रीमंतीचा उपयोग केला. मगापासूनची माझी तगमग शब्दाशब्दातून बाहेर पडू लागली. कदाचित या चोरामुळेच मला बागेत फिरता आलं नाही, माझ्या मनातील माणसांच्या माणुसकीबद्दल असणार्‍या विचारांना सुरुंग यानेच लावला असं काही वाटून वाटून मी त्याला झापत होते. आजूबाजूची चारपाच माणसं गोळा झाली. सगळा प्रकार मी त्यांना कथन केला. पण ते फार काही बोलले नाहीत. तरीही एकाने त्याला काही विचारताच तेवढ्यात तो चोर म्हणाला, 

"मैने क्या किया है? मै तो सिर्फ यहॉं खडा हूॅं। वो मॅम क्या बोल रही है मेरे समज में भी नही आ रहा है। मैने कुछ नही किया।"


मी ते ऐकून आवाक् च! आता मात्र  माझ्या तळपायाची आग मस्तकात शिरली. अहो  तिनं का शिरु नये?  तुम्हीच मला सांगा. म्हणजे मी इतक्या शिव्या देऊन त्याला एकही शिवी लागू नये? मी रागवावं अन् त्याला ते कळू नये? माणुसकीच्या चार गोष्टी सांगून त्याला एकही कळू नये? आरं कुठं निऊन ठिवला माझा महाराष्ट्र?


या गोष्टीचा मला इतका राग आला की सांगूच नका. तो आलेला दुप्पट राग आता हिंदीतून पाखडावा लागणार होता. आजूबाजूच्या माणसांनी थोडंफार बोलून त्याला तिथून जायला सांगितलं व तेही गेले. पण माझा आत धुमसत असणारा राग मला गप्प बसू देईना.


लांब चाललेल्या चोराला जोारात ओरडून म्हटलं, "ऐ रुक जरा." आणि आसा त्याला परत झापला की सांगूच नका. अर्ध्या हिंदी अन् अर्ध्या मराठीचा त्याच्यावर किती प्रभाव पडला माहित नाही पण मला जरा शांत वाटलं. त्याच्या चेहर्‍याकडं पाहिलं तर त्याचा चेहरा निर्वीकार. ते पाहून पून्हा मला राग येऊ लागला. त्याचा हा भाव पाहून 'चोरी कर पण कमीत कमी शिव्या तर समज' अशा आशयाची 'भीक नको पण कुत्रा आवर' सारखी गत झाली. 


'चोरी करताना वेगवेगळ्या भाषेचं ज्ञान असू दे, म्हणजे ज्याची चोरी केली त्याचा राग तुला कळेल.' हे त्याला खूप ओरडून सांगावं वाटत होतं पण...

पण तो ऐकायला थांबेल कशाला नाय का?



तर अशी जीवाची मुंबय केलेली लक्षात न राहणार तर नवलच. म्हणून आता फक्त हात हालवतच उद्यानात आलेय.  चोर नको, चांदणं नको अन् शिव्या न कळ्यालाचा रागही नको. 



✍🏻फुटूवाली मी

      कृष्णा


Tuesday, 4 April 2023

मावळती वेळी

 मला रंगाचं अमाप आकर्षण

करतो जणू हा म‍ाझ्याचसाठी उधळण



✍🏻फुटूवाली मी

      कृष्णा